पाणीपुरवठा पाईपलाईन चे काम मार्गी लावण्याची मागणीt
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:- शहरात सुरळीत व नियमित पाणीपुरवठा व्हावा याकरिता महानगरोत्थान योजनेअंतर्गत मी रामटेक नगरपालिकेची उपाध्यक्ष असताना १६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. सदर योजना २०१९-२० मध्ये कार्यान्वित होऊन बहुतांश भागात पिण्याचे पाणी पोहोचले परंतु सदर योजनेत शहरातील काही भागाचा अंतर्भाव न झाल्याने आझाद वार्ड, विनोबाभावे वार्ड, भगतसिंग वार्ड सह स्वामी विवेकानंद वार्डातील बर्वे लेआऊट परिसरात अजूनही पाणी समस्या निर्माण होत असते... त्यामुळे अंबाळा फिल्टर प्लांट ते रामतलाई पर्यंत डी आय पाईप लाईन टाकून फिल्टर प्लांट वर आवश्यक ते पंप व मशिनरी लावण्याच्या प्रस्तावाला त्वरीत मंजुरी देण्यात यावी. अशी मागणी रामटेक नगरपालिकेच्या नगरसेविका तथा माजी उपाध्यक्ष कविता मुलमुले यांनी जिल्हाधिकारी नागपूर आणि नगराध्यक्ष व मुख्याधिकारी रामटेक यांना केली आहे. सन २०२२ नंतर रामटेक नगरपालिकेत प्रशासक राजवटी दरम्यान रामटेक शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याकरिता अंबाळा फिल्टर प्लांट ते रामतलाई टॅंक पर्यंत पाईपलाईन टाकून व अंबाळा फिल्टर प्लांटमध्ये पंप आणि काही मशिनरीज बसवून शहराला वाढीव पाणीपुरवठा व्हावा याकरिता चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या निर्देशनाने जिल्हाधिकारी कार्यालयात जून २०२५ मध्ये एक बैठक घेऊन सदर कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. पाणीपुरवठा कामाबद्दल नगरपालिका रामटेक व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी संयुक्तपणे प्रस्ताव तयार केला. खनिज विकास निधी अंतर्गत ४ कोटी ८८ लक्ष ३२ हजार ७५० रुपये इतक्या रकमेच्या कामाला त्यावेळेस तांत्रिक मंजुरी प्रदान करण्यात आली होती. पाणीपुरवठा कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अंबाळा फिल्टर प्लांट ते रामतलाईपर्यंतची २०१७ चे अगोदर टाकण्यात आलेली एचडीपी पाईपलाईन पाण्याचा जास्त दाब निर्माण झाल्यास फुटण्याचे प्रमाण जास्त आहे... एकदा फुटलेली पाईपलाईन लवकर दुरुस्त होत नाही, त्यामुळे शहरातील आझाद वार्ड, विनोबाभावे वार्ड, बर्वे लेआउट, भगतसिंग वार्ड आदी भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असते... ती समस्या कायमस्वरूपी दूर करण्याकरीता पाणीपुरवठा योजनेचे प्रस्तावित काम मार्गी लावावे अशी मागणी करण्यात आली आहे...
