रोहा :- विशेष प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सामाईक जलशुद्धीकरण केंद्रात तसेच सीईटीपी हद्दीतील आगीच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ माजली...
जलशुद्धीकरण केंद्राच्या टाक्यांमध्ये पाणी सोडणाऱ्या पाईपलाईनसह बाजूला साठवून ठेवलेले पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. धाटाव अग्निशमन केंद्राचे अधिकारी हरेश्वर पाटील व त्यांचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवन्यात त्यांना तातडीने यश आले...
आग लागल्याच्या ठिकानी लागतच रसायन केमिकल युक्त एक्सल कंपनी आहे, त्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे दिसत आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर सामाईक प्रक्रिया केंद्र ज्यांचे अखत्यारीत आहे ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व हे प्रक्रीया केंद्र सांभाळणाऱ्या संबंधित एजन्सीचे कोणीही जबाबदार व्यक्ती आगीच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे दिसून आले...
धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखान्यांचे रासायनिक पाण्यावर सामाईक प्रक्रिया केंद्रात पूर्ण प्रक्रीया करून ते पुढे खाडीत सोडण्यात येते. हे केंद्र नेहमीच वादातीत राहिले आहे. रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या अखत्यारीखाली हे केंद्र आधी चालवण्यात येत होते. आता हे केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धाटाव उपविभागाच्या देखरेखीखाली एका खाजगी एजन्सीमार्फत चालवण्यात येत आहे. मात्र येथील कारभार हा दिवसेंदिवस मनमानी होत असल्याचे वास्तव आज लागलेल्या आगीतून पुन्हा समोर आले...