महाराष्ट्र वेदभुमी

हे मृत्यूच्या देवता यमराजा...खड्ड्यांमुळे जनतेचे प्राण घेऊन जाऊ नकोस..



अलिबाग रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्यासाठी सत्यवानाकडे साकडे

अलिबाग : वटपौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग परिसरातील सत्यावनांनी प्रशासनाचे लक्षवेधी अनोखे आंदोलन केले. अलिबाग बायपास येथे पेण अलिबाग रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्यासाठी साकडे यावेळी सत्यवानांनी घातले....गेले अनेक वर्षांपासून अलिबाग बायपास येथील खड्ड्यांची असणारी समस्या कायमची संपवून संभाव्य अपघाताला आळा घालण्यासाठीची मागणीदेखील स्थानिक नागरिकांनी केली. निमित्त रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे होते परंतु योग मात्र वटपौर्णिमेचा होता... 

 अलिबाग शहराच्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या अलिबाग वडखळ रस्त्यावर अनेक वर्षे खड्ड्यांचे साम्राज्य आहे... हे खड्डे बुजविण्याचा अनेकदा प्रयत्न झाला आहे... लोकप्रतिनिधींनी खड्डे बुजविण्याची मागणीदेखील केली आहे... परंतु या मागणीला आणि प्रयत्नाला शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत... या रस्त्यावर सुमारे 3 फुटांचे खड्डे पडले आहेत... पाऊस असल्यावर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळे तयार होते... याचा नाहकचा फटका वाहनचालकांना बसत आहे. या ठिकाणी कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे...

लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक तरुणांनीच गांधींगिरीचा पर्याय निवडला... या तरुणांनी वट पौर्णिमेच्या दिवशी शासनाचे लक्ष वेधले आहे... तरुणांनी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात वडाचे झाड लावून विधिवत पूजा करून वडाला फेऱ्या मारल्या...

 या दरम्यान त्या तरुणांनी वाहनचालकांचे प्राण वाचवण्याचे साकडे घालून अधिकारी वर्गाला सद्बुद्धी देण्याची विनवणी केली... तरुणांनी केलेला हा प्रकार पाहून वाहनचालकांनी आणि नागरिकांनी त्यांना साथ दिली...

Post a Comment

Previous Post Next Post