पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर )
लेकरासाठी प्राण प्रणाला लावणारी फक्त आई असते :-ह. भ.प. बबन महाराज वांजळे
छत्रपती शिवाजी महाराज यांना हिरोजी इंदुलकर यांनी सांगितले होते की ४४०० फूट उंचीचा गड आहे या गडावरून खाली जाईल ते पाणी वर येईल ती हवा यामुळे तुमच्या शेजारी कोणी ही येऊ शकणार नाही. परंतु गडाचे दरवाजे बंद झाल्यावर लेकरासाठी मृत्यूला आमंत्रण देत ती माऊली गडावरून खाली उतरली व लेकराला स्तनाशी धरून दुध पाजले तेव्हा त्या आईचे मन शांत झाले.त्यावेळी तीला पालखीतून गडावर आणले तेव्हा शिवाजी महाराज यांनी हिरोजी इंदुलकर यांना सांगितले की तुम्हीतर म्हणाले की या गडावरून कोणी येऊ शकत नाही यावर हिरोजी इंदुलकर यांनी उत्तर दिले की ती महाराष्ट्राची आई आहे...
मातेचिये चित्ती l अवधी बाळाकाची व्याप्ती ll
देह विसरे आपुला l जवळी घेता सिण गेला ll
दावी प्रेम भाते l आणि अंगावरी चढते ll
तुका संतापुढे l पायी झोंबे लोंड कोंडे ll
असे मत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे हभप बबन महाराज वांजळे यांनी गोवे येथील कुणबी समाज नेते रामचंद्र सटू जाधव यांच्या ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन सेवेत व्यक्त केले..
यावेळी नंदू महाराज तेलंगे, कापसे महाराज, बलकावडे महाराज, जांबेकर महाराज, गायनाचार्य घनश्याम सावळे महाराज, गणेश दिघे महाराज, संजय महाराज, गुजर महाराज, श्रवण महाराज, जाधव महाराज, शांताराम पवार महाराज, सुधीर दिघे, रामचंद्र पवार, नामदेव जाधव, सुभाष वाफिलकर, कोलाड खांब परिसरातील असंख्य नागरिक, गोवे ग्रामस्थ, महिला वर्ग असंख्य तरुण वर्ग उपस्थित होते..
बबन महाराज वांजळे यांनी कीर्तन सेवेत आपले मत व्यक्त करतांना सांगितले की माणूस किती वर्षे जगाला हे महत्वाचे नसून त्याला मिळालेल्या आयुष्याचे सोने कसे करता येईल हे महत्वाचे आहे. गुलाबाच्या झाडाला काटे येतात त्या गुलाबाच्या झाडाला फुल येतो एक दिवस काटे अहंकाराने त्या गुलाबाला म्हणाले की तुझे आयुष्य दोन दिवसाचे आहे त्यावर गुलाबाच्या फुलाने उत्तर दिले की माझे आयुष्य कमी आहे पण मी दुसऱ्याला सुगंध व समाधान देतो तुझे काम फक्त टोचत राहणे एवढेच आहे...
कुणबी समाज जेष्ठ नेते रामचंद्र सटू जाधव (रावसाहेब) व सौ. अरुणा रामचंद्र जाधव या उभयतांच्या ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे परिवार,कुणबी समाज बांधव, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर, समस्त गोवे ग्रामस्थ, तरुण वर्ग महिला वर्ग उपस्थित होते.
