उरण दि २० प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे)
कैलास सदाशिव सुर्वे आदिवासी जमिनी हस्तांतर कब्जा करून कोट्यवधी रु कमवत असल्याचा प्रकार उघड
उरण तालुक्यातील दिघोडे, कंठवली, विंधने , वेश्र्वी, चिरनेर ह्या भागात व्यावसायिक म्हणून प्राबल्य असलेल्या कैलास सदाशिव सुर्वे यांनी आदिवासी जमिनी अवैध्य रित्या हस्तांतरित करून त्यावर कब्जा करून त्या जमिनींवर व्यवसाय उभारून कोट्यवधी रुपये कमवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे...मौजे दीघोडे येथील गोपाळ लहान्या कातकरी याची पाच एकर जमीन ही आदिवासी खातेदारांची जमीन असल्याचे माहिती असतानाही घरत कुटुंबीय यांच्या कडून सन १९९५ साली फक्त पाच लाख रुपयांत अवैध्यरित्या शासनाची कोणतीही परवानगी न घेता हस्तांतरित केली असून त्यावर मोठे कंटेनर यार्ड बांधून कोट्यवधी रुपयांचा नफा मागील २८ वर्षापासून मिळवत आहे...
अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असताना पुन्हा त्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार
मुक्ता कातकरी हीने या संदर्भात तक्रार केली असून उरण पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ९६/२०२३ मध्ये कैलास सुर्वे ह्याला अट्रोसिटी कायद्या अंतर्गत मुख्य आरोपी क्रमांक ५ केले आहे...पनवेल सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे... हे गंभीर प्रकरण सुरू असतानाच आदिवासी समाजातील अजून एका कुटुंबाची जमीन हडप केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे... मौजे कंठवली तालुका उरण येथील सर्व्हे नंबर १३/३/ब आणि १३/३/क दत्ता गोऱ्या कातकरी आणि कुटुंबीय यांची२५ गुंठे जमीन मिळकतीवर अवैधरित्या कब्जा करून त्यावर कंटेनर यार्ड बांधले आहे...दत्ता गोऱ्या कातकरी यांचे आईवडील अशिक्षित असल्याचा फायदा घेवून २०-२५ वर्षांपूर्वी सदरही जमीन अवैध्यरित्या हस्तांतरित करून त्यावर कब्जा केला असून त्यावर कंटेनर यार्ड बांधून कोट्यवधी रुपयांचा नफा मागील २०-२५ वर्षांपासून मिळवत आहे..
जमिनी बदल्यात तेवढीच जमीन दुसऱ्या ठिकाणी दिली जाईल..तक्रार मागे घेण्यास दबाव
अवैध्य हस्तांतरण लक्षात आल्यावर दत्ता कातकरी याने जिल्हाधिकारी आणि इतर महसूल अधिकारी यांच्याकडे उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ऑगस्ट २०२२ मध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता...त्या तक्रार अर्जाची दखल घेवून जिल्हाधिकारी यांनी कारवाई देखील सुरू केली होती...कारवाई सुरू झाल्याचे लक्षात आल्यावर कैलास सुर्वे यांनी एका एजंट मार्फत दत्ता गोऱ्या कातकरी आणि रोहिदास गोऱ्या कातकरी यांच्या नावे पाच हजार रुपयांचे दोन चेक पाठविले होते आणि तक्रार मागे घेण्यास सांगितले...परंतु ते चेक त्यांनी न स्वीकारल्याने त्याने पुन्हा एजेंटमार्फत निरोप पाठवून दत्ता कातकरी यांस त्यांच्या ऑफिसला भेटायला बोलावले...परंतु ऑफिसला भेटायला जाण्याअगोदरच कैलास सुर्वे यांनी दत्ता गोऱ्या कातकरी, रोहिदास गोऱ्या कातकरी आणि मीना पवार हीच्या बँकेतील अकाउंटवर परस्पर दहा लाख( एकूण दहा लाख) रुपये पाठविले आणि फोनवरून सांगितले की पुढील एक महिन्यात ह्या जमिनी बदल्यात तेवढीच जमीन दुसऱ्या ठिकाणी दिली जाईल व तक्रार मागे घेण्यास दबाव आणला... त्या दबाव तंत्राला बळी पडून दत्ता कातकरी यांनी तक्रार मागे घेतली...
दत्ता कातकरी याने वकिलांच्या सल्ल्याने स्वतः हून जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार
कैलास सुर्वे यांनी एक वर्ष झाले तरी कोणत्याही प्रकारे दत्ता कातकरी यांच्याशी संपर्क साधला नाही... आणि दत्ता कातकरी याने संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही कैलास सुर्वे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही...पुन्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दत्ता कातकरी याने उरण सामाजिक संस्थेकडे धाव घेतली परंतु मागील तक्रार कारण नसताना मागे घेतल्याने उरण सामाजिक संस्थेने पुन्हा मदत करण्यास स्पष्ट नकार दिला...म्हणून दत्ता कातकरी याने वकिलांच्या सल्ल्याने स्वतः हून जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करून उरण तालुक्यातील आदिवासी खातेदार यांच्या जमिनी अवैद्यरित्या हस्तांतरित करून फसवणूक करणाऱ्या मास्टरमाईंड कैलास सुर्वे यांच्या विरोधात अत्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे..सदर प्रकरण गंभीर असल्याने अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी तहसीलदार उरण डॉ उद्धव कदम यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत...
