क्रिडाप्रेमींसह खेळाडू ' स्वतंत्र मैदान ' च्या प्रतिक्षेत
विविध कार्यक्रमांमुळे नेहरू मैदानाची दुर्दशा
पत्रपरिषदेमध्ये राज्यमंत्र्यांचे नविन मैदानाबाबद सुतोवाच
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:- शहरासह संपूर्ण रामटेक तालुक्यात क्रिडाप्रेमिंसह खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक खेळाडू शहरातील भव्य अशा याच नेहरू मैदानावर सराव करून तथा विविध टुर्नामेंट व क्रिडा स्पर्धांमध्ये खेळून जिल्हा तथा राज्यपातळीवरच्या स्पर्धांमध्ये पोहोचले आहे. शहरातील नेहरू मैदान विशेषतः क्रिकेट टुर्नामेंटसाठी चर्चित आहे. गेल्या एक दशकापुर्वीपर्यंत या मैदानावर वर्षातुन अनेकदा क्रिकेट टुर्नामेंटचे विविध आयोजकांकडून आयोजन केले जायचे. मैदानाच्या सभोवताल प्रेक्षकांची रिघ लागायची मात्र आता ते दिवस हरवल्यागत झाले आहे. विविध क्रिडा स्पर्धांसाठी तथा विशेषतः क्रिकेट टुर्नामेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या या नेहरू मैदानाची येथे पार पडणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे पुरती वाट लागलेली आहे. तेव्हा खेळाडूंनी खेळायचे कुठे ? विविध क्रिडा टुर्नामेंट चे आयोजन करायचे कुठे ? असे केविलवाणे प्रश्न खेळाडुंसह क्रिडाप्रेमींनी प्रामुख्याने उपस्थित केले आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सध्या या नेहरू मैदानाला ' भव्य स्टेडीयम ' बनविण्याचा जणु निर्धारच केलेला आहे. जवळपास वर्षभरापासून कोटींचा निधी खर्चुन या मैदानाला ' भव्य स्टेडीयम ' स्वरूप देण्याचे काम सुरु आहे. राज्यमंत्री जयस्वाल अधुनमधुन स्वतः या मैदानावर आपला ताफा घेऊन पोहोचतात व मैदानात होणाऱ्या कामाची पहाणी करून संबंधीत कंत्राटदाराला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. मैदानात हिरवे गवत, सभोवताल दर्जेदार दगडांची सुरक्षा भिंत, प्रेक्षकांसाठी बैठकीची व्यवस्था आदी. दर्जेदार कामे येथे होत असुन नेहरू मैदान आता जणु कात टाकल्यागत दिसुन येत आहे. शोकांतिका अशी की या मैदानावर क्रिडा स्पर्धा ऐवजी इतर कार्यक्रम पार पडली तर पेंडाल उभारणे व खुर्च्या ठेवल्याने तथा स्टेज उभारल्याने या मैदानात जागोजागी खड्डे पडत असतात व त्यामुळे पुरत्या मैदानाची ऐसीतैसी होत असते. एकीकडे मैदानाच्या विकासाची कामे जवळपास वर्षभऱ्यापासुन सुरु आहे तर दुसरीकडे ही कामे सुरू असल्याने येथे खेळण्यासाठी मनाई करण्यात आल्याने आता कुठे खेळायचे, टुर्नामेंट भरवायची कुठे असे नानाविध प्रश्न खेळाडूंसह क्रिडाप्रेमींना पडलेले आहे...
नविन मैदानाबाबद राज्यमंत्र्यांचे सुतोवाच
येत्या ३० जानेवारी पासुन याच मैदानावर भव्य ' रामटेक सांस्कृतीक महोत्सवाचे ' आयोजन करण्यात येत आहे. त्याअणुषंगाने राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाबाबद अधिकृत माहिती दिली. यावेळी तहसिलदार, नगर परिषद पदाधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदी. उपस्थित होते. यादरम्यान उपस्थित काही पत्रकारांनी खेळाडुंसाठी एक सुसज्ज मैदान उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली तेव्हा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी उपस्थित नगर परिषदेच्या पदाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांना नविन मैदानासाठी जागा घेण्याचे सुतोवाच काढले..
