प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या बोनसाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दीर्घकाळाच्या पाठपुराव्यानंतर शासनाने बोनस वितरण प्रक्रिया सुरू केली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ लागली आहे. याप्रश्नी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव व मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन मेश्राम यांनी सातत्याने संघर्ष केला. बोनस जाहीर होऊनही वितरण थांबले असल्याने हजारो शेतकरी संभ्रमात होते. शासनाने २५ मार्च २०२५ रोजी प्रतिहेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर केला होता; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती...
दोनदा मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
रोशन मेश्राम यांनी या संदर्भात दोनदा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवेदन सादर केले होते. त्यांनी स्पष्ट मागणी केली होती की-पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ बोनस जमा करावा, तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि वितरणासाठी ठोस वेळापत्रक जाहीर करावे...
“बोनस भीक नव्हे, श्रमाचा न्याय” - मेश्राम
या संदर्भात बोलताना रोशन मेश्राम म्हणाले "शेतकरी संकट सहन करू शकतो, पण शासनाच्या आश्वासनावर ठेवलेला विश्वास मोडला तर त्याला वेदना होतात. बोनस ही आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्याच्या श्रमाला दिलेला न्याय आहे."
शेतकऱ्यांना दिलासा
शासनाने बोनस वितरण सुरू केल्याने मौदा तालुक्यासह विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बोनसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे हास्य दिसत आहे...
पुढील पाठपुरावा सुरूच
“अजूनही ज्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही, त्यांच्या पर्यंत हा हक्काचा पैसा पोहोचावा यासाठी पाठपुरावा सुरू ठेवू,” असा निर्धार रोशन मेश्राम यांनी व्यक्त केला.
