कधी ग्रामपंचायत अधिकारी तर कधी तलाठ्यांची चेकपोस्टवर ड्युटी
विविध कामांसाठी लोकांची भटकंती
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- तालुक्यात विविध नदी - नाल्यांमधुन गौण खनिज असलेल्या रेतीचे अवैधरित्या व प्रमाणाबाहेर उत्खनन व ती क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाहनांमध्ये भरून त्याची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर आळा बसावा या उदात्त हेतुने शासनाने तालुक्यातील तिन ठिकाणी चेकपोस्ट तयार केलेले आहेत मात्र या ठिकाणी लोकांची सरळसरळ व अनेक कामांशी संबंध येणाऱ्या तलाठ्यांची नियुक्ती केल्याने आता लोकांवर आपल्या विविध कामांसाठी तलाठ्यांचा शोध घेण्याची वेळ येणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे...
उल्लेखनिय बाब अशी की लोकांची सरळसरळ व अनेक कामांशी संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच शासन चेकपोस्टवर का टांगते ? असा सवाल लोकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरासह तालुक्यात इतर काही कार्यालये आहेत जिथे कर्मचारी दिवसभर खुर्च्या तोडत बसत असतात तथा टाईमपास व्हावा यासाठी मोबाईलचा वापर करीत असतात. अशा कर्मचाऱ्यांचा शासनाने शोध घेऊन त्यांना या चेकपोस्टवर नियुक्त करावे. तलाठी असो वा ग्रामपंचायत अधिकारी ( ग्रामसेवक ) यांचेशी लोकांना नेहमी काम पडत असते. हे कर्मचारी जागेवर किंवा त्यांच्या कार्यालयात नसले तर लोकांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकतात. परंतु राज्य चालविणाऱ्या राज्यकर्त्यांना या गोष्टीची भुरळ पडल्याचे दिसुन येत आहे. म्हणुनच की काय तर कधी ग्रामपंचायत अधिकारी तर आता तलाठयांची ड्युटी या चेकपोस्टवर लावलेली आहे...
चेकपोस्टवर होमगार्डवर्गाला रोजगार द्याना
कामाच्या कर्मचाऱ्यांना या चेकपोस्टवर गुंतवुण लोकांची कामे खोळंबविण्यापेक्षा आर्थिक स्थितीने नाजुक व बंदोबस्तात ड्युटी लागण्याची चातकासारखी वाट पहात असलेल्या होमगार्डची नियुक्ती या चेकपोस्टवर करण्यात शासनाला हरकत तरी काय आहे ? सध्याघडीला होमगार्ड वर्गाची आर्थिक स्थिती मोठी बिकट आहे. ते कामाच्या शोधात इतरत्र भटकत असतात. संसारगाडा हाकणे त्यांच्यासाठी दिवसेंदिवस खुप जड होत चालले आहे. होमगार्डसोबत एक पोलीस कर्मचारी तैनात करून चेकपोस्टची धुरा त्यांच्याकडे दिल्याने रेतीमाफीयांवरही वचक बसेल अन् होमगार्ड मंडळींची आर्थिक चणचणही दुर होईल यात तिळमात्रही शंका नाही...
