सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो... या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात... पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो...बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे... महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो... महाराष्ट्रासह विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो...
यावर्षी २ सप्टेंबरला सोमवारी बैलपोळ्याचा सण साजरा झाला..
रामटेक शहरात आणि तहसील परिसरात प्रत्येक गावात ६ ते ७ ठिकाणी पोळाचे आयोजन उत्साहात करण्यात आले... विविध रंगबेरंगी झुल सजवून अनेक शेतकर्यांनी बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग देवून अंगावर झुल टाकुन नेहरू मैदानात बैलांचा पोळा भरला होता... आकर्षक रंगांनी सजवून नटलेल्या वृषभराजास मोठ्या थाटामाटात शेतकर्यांनी पोळ्यात आणले होते...
नेहरु मैदानात नगरपरिषदेतर्फे सर्वात मोठा पोळाचे आयोजन करण्यात आले... येथे १४ बैलजोड्या घेऊन शेतकरी उपस्थित होते... प्रत्येक बैलजोडीला रामटेक नगरपरिषदेतर्फे ३०१ रुपये, आमदार आशिष जैस्वाल यांच्याकडून भेटवस्तू आणि चंद्रपाल चौकसे यांच्याकडून दुप्पटा देण्यात आला...यावेळी आनंदधामचे संस्थापक लक्ष्मण मेहर बाबू, ओम नमोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, माजी नगरसेवक सुमित कोठारी, सुरेखा माकडे यांच्यासह मोठ्या संख्येने बैल धारक व नागरिक उपस्थित होते. पोळा कार्यक्रमाचे संचालन प्रकाश उईके यांनी केले...
यासोबतच गावागावातही पोळा उत्साहात साजरा करण्यात आला... प्रत्येक घरात बैलाची पूजा होते... मात्र बैलांची संख्या कमी असल्याने महिला बैलांची वाट पाहत होत्या, मात्र सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने काही महिला बैलांची पूजा करण्यापासून वंचित राहिल्या...
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण
आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे... कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे... शेतकर्यासोबत वर्षभर शेतात राबणार्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो... बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात... पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात...
बैल पोळ्याचे आधुनिक रूप आणि सामाजिक महत्त्व
बैल पोळ्याच्या सणाला आधुनिक काळात एक नवा रंग आला आहे... या सणाच्या निमित्ताने शेतकरी, तरुणाई आणि पर्यटकही मोठ्या संख्येने या उत्सवात सामील होतात... शेतकरी आपल्या कष्टाचे फळ साजरे करण्यासाठी या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहतात... तंत्रज्ञानाच्या युगातही ही परंपरा टिकून आहे आणि समाजात एकत्रिकरणाची भावना निर्माण करते...
