महाराष्ट्र वेदभुमी

शेतकऱ्यांचा भात रोवणीसाठी धरणाचे पाणी द्या...!



सचिन चौरसिया प्रतिनिधी

माजी खासदार प्रकाश जाधव यांची मागणी

रामटेक : यंदा पाऊस उशिराने सुरु झाला असुन आता पर्यत पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत...नागपूर जिल्ह्यातील रामटेक, पारशिवनी, मौदा तालुक्यात येणाऱ्या परिसरात धान पिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भात रोवणीसाठी धरणाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदनाद्वारे केली आहे...

रामटेक, पारशिवनी या तालुक्यासह मौदा तालुक्यातील अनेक शेतकरी धान पिकाची शेती करतात...सद्यस्थितीत या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी काही शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही... त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पाण्याअभावी मृत पावत आहे...म्हणजेच शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाली असून शेतकऱ्यांनी जगावे की मरावे ?असा प्रश्न उपस्थित झाला आहे...

या भागात पेंच,तोतलाडोह आणि खिंडसी असे प्रमुख जलाशय असून या जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांना शेतीच्या उपयोगासाठी देण्यात यावे.. अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देऊन केली...शेतकऱ्यांना जर पाणी मिळाले तर त्यांचे पीक वाचल्या जाईल व सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माहिती माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिली..

Post a Comment

Previous Post Next Post