सचिन चौरसिया रामटेक
रामटेक : महर्षी अगस्ती आश्रम गडमंदिराचा कार्यभार वैष्णव पंथीय संता कडे सोपविण्याची मागणी भारतीय जनसेवा मंडळाने सोमवार (दि.०८) ला प्रशासनाकडे केली आहे. संत गोपालदास बाबा व त्यांचे शिष्य तुकाराम बाबा यांच्या निधनानंतर आश्रमात धार्मिक कार्यात खंड पडला आहे. अलीकडेच प्रशासनाच्या कारवाईनंतर बेकायदेशीर राहणाऱ्या महिलेला आश्रमातून बाहेर काढण्यात आले. आश्रमात राधाकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर तसेच संतांच्या समाध्या असून तेथे दररोज पूजा, आरती, नैवेद्य, शयनआरती तसेच अखंड ज्योत व धुनी परंपरेनुसार प्रज्वलित ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय एकादशीचे भजनकिर्तन, गुरु पौर्णिमा, संत पुण्यतिथी, गंगा दशहरा, त्रिपुरी पौर्णिमा, जन्माष्टमी आदी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. भारतीय जनसेवा मंडळाने मांगनी केली की, या सर्व धार्मिक विधी नियमितपणे पाळता येतील, यासाठी आश्रमात वैष्णव पंथीय ब्रह्मचर्याचे पालन करणारा संत स्थायी स्वरूपात राहणे गरजेचे आहे. जेणेकरून परंपरेचे रक्षण होईल आणि आश्रमाचे धार्मिक वातावरण अबाधित राहील. या संदर्भात मंडळाने उपविभागिय अधिकारी प्रियेश महाजन यांना योग्य संताकडे पदभार सोपविण्याची विनंती केली आहे. यावेळी भारतीय जनसेवा मंडळचे सचिव व माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, पदाधिकारी धनराज काठोके, सुभाष बघेले, चंद्रकांत ठक्कर, विनायक डांगरे , नत्थु घरजाळे, शहित दमाहे, बालचंद खोडे उपस्थित होते...
