प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; महिलेसह बालकाचा जीव धोक्यात
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक गरजू गरिबाला त्याच्या हक्काचे घर मिळावे म्हणून मोठा निधी खर्च करण्यात येत आहे.मात्र सरकारच्या या योजनांचा गरिबापर्यंत त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी कशी अडचण येते याचे मोठे उदाहरण हिवरा (बेंडे ) गावात या महिलेच्या समस्येवरून दिसून आले. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रामटेक तालुक्यातील हिवरा( बेंडे ) येथे राहणाऱ्या सुकेसनी पंकज मेश्राम यांच्यावर भर पावसाळ्यात मोठीच समस्या निर्माण झाली आहे. सुकेसनी यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून त्या आपल्या लहान बालकासह राहतात. त्यांचे घरकुल मंजूर झाले आहे. मात्र उभ्या करण्यात आलेल्या घरकुलाच्यावर हाय कनेक्शन वीजतारा गेल्यामुळे संबंधित ठेकेदार कोणताही धोका होण्याची शक्यता व्यक्त करून घरावर स्लॅप टाकायला तयार नाही. घराच्या भिंती तयार होऊन पंधरा-वीस दिवस झाले आहेत. मात्र वीजतारांच्या कनेक्शनमुळे ठेकेदार तिथे स्लॅप टाकायला तयार नाही. अशा परिस्थितीत ही विधवा महिला चिमुकल्या मुलासह घराच्या मागेच तुटक्या फुटक्या झोपडीत राहत आहे. प्रचंड वारा, वादळ, विजांचा कडकडाट व पावसामुळे त्या झोपडीतील त्यांचे राहणे धोकादायक आहे. जागोजागी वीज कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत.अशा परिस्थितीत नाजूक झोपडीत मुलासह महिला कशी काय राहत असेल हा विचार करूनच मन सुन्न होते. एक दिवस रात्रभर मुलगा रडत राहिला असे त्यांनी सांगितले. निवेदन दिल्यानंतर संबंधित प्रशासनाकडे वीजतारांची सोय करण्याबाबत भरपूर कालावधी होता.परंतु त्यांनी योग्य कार्यवाही न झाल्याने या गरीब महिला अडचणीत आल्या आहेत. भर पावसात आता कसे करायचे ? असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला असुन मी पोराला शिकवू त्याला पोसू की शासन-प्रशासनाचा त्रास सहन करू असा खिन्न करणारा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तुटक्या फुटक्या झोपडीत प्रचंड वारा,वादळ व पावसात आपला व आपल्या मुलाचा जीव धोक्यात असल्याचेही त्यांनी सांगितले...
आता आत्महत्या करायची काय ?
घरकुलाच्या बांधकामासाठी तिथून वीजतारा हटविण्याबाबत त्यांनी १ आक्टोंबर २०२४ ला संबंधित वीज अभियंत्यांकडे निवेदन देऊन समस्या दूर करण्याची मागणी केली होती... मात्र आतापर्यंत संबंधितांद्वारे कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे सुकेतनी यांनी २९ मे ला बोलताना सांगितले. अशास्थितीत त्या अत्यंत चिंताग्रस्त व तणावयुक्त झाल्या आहेत. आपण आता काय आत्महत्या करायची काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे...