सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले असून, ०३ ऑक्टोबर पासून येथील कर्मचाऱ्यांनी पंचायत समिति कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले... रामटेक पंचायत समिति अंतर्गत १०० महिला उमेद मधे कार्यरत आहे...महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) तालुक्यात हजारो महिला स्वयंसहाय्यता समूहामार्फत जोडल्या गेल्या आहेत... या महिलांना प्रशिक्षण देणे, वित्तीय व्यवस्थापनाचे महत्त्व तसेच त्यांच्या उपजीविकेमध्ये वाढ होण्यासाठी उमेदचे कर्मचारी, अधिकारी रात्रंदिवस परिश्रम करून अभियानासाठी काम करीत आहेत...परंतु त्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे...
यामुळेच दि. १० ते १२ जुलै दरम्यान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले... मात्र, आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांनी अजून केलेली नाही... त्यामुळे अभियानाच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे... दरम्यान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, समुदाय संसाधन व्यक्ती यांना आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे शासकीय दर्जा देण्यात यावा, या मागण्यांसाठी काम बंद करून पंचायत समिति कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन चालू आहे...
