सोगाव अलिबाग :अब्दुल सोगावकर
अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथे आराध्या संदानंद पोळे (६ वर्षे)व सार्थक संदानंद पोळे ( ३ वर्षे ) या दोघांचा दुपारनंतर झोपेतच मृत्यू झाली असल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद शीतल सदानंद पोळे (किहीम आदिवासी वाडी, मूळ राहणार - मु. बेलोरा, तालुका - पुसद, जि.यवतमाळ) यांनी मांडवा पोलिस ठाण्यात दिली आहे...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शीतल सदानंद पोळे, सदानंद नामदेव पोळे हे आपल्या दोन मुलांसह किहीम येथील दाजीबा पटोले यांच्या वाडीत एक वर्षांपासून काम करत आहेत. रविवार दि. ३१ मार्च २०२४ रोजी दुपारी जेवल्यानंतर आराध्या व सार्थक हे झोपले होते, सायंकाळी झोपेतून उठत नाही म्हणून त्यांना उठविण्यासाठी त्यांची आई शीतल गेली असता ती दोन्ही बेशुद्ध अवस्थेत दिसली... याबाबतची खबर सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाली असती त्यांनी दोन्ही मुलांना आपल्या रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री आठ वाजता मृत घोषित केले...
यावेळी जिल्हा रुग्णालयात शीतल सदानंद पोळे व सदानंद नामदेव पोळे यांचे नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. सदर घटनेबाबत मांडवा पोलिस सोमनाथ लांडे यांनी सांगितले की, आम्ही रात्री उशिरापर्यंत अधिक चौकशी करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात घेऊन जात सोमवार दि. १ एप्रिल रोजी शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले, या मुलांचे अंतिम विधी करण्यासाठी त्यांच्या मूळगावी पुसद- यवतमाळ येथे घेऊन गेले आहेत, याबाबत जे.जे. रुग्णालय यांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होणार असल्याचे शेवटी सांगितले...